Skip to main content

Rangnath Swami (Nazrekar)

रंगनाथस्वामी निगडीकर हे समर्थ पंचायनातले एक सत्पुरुष होते. ते दिसायला अतिशय सुंदर आणि मोहक होते. मनाने विरक्त असूनही त्यांचा थाट एखाद्या मोठ्या सरदारासारखा असे. ते स्वतः घोड्यावर बसून प्रवास करीत. त्यांच्याबरोबर मोठा लवाजमा असे. वैभवशाली राहण्यामुळे त्यांच्या विरक्तीबद्दल लोकांना नेहमीच शंका वाटत असे. अशा शंकेखोरांनी दोन वेळा शिवाजी महाराजांचे मन रंगनाथस्वामींबद्दल कलुषित करण्याचा प्रयत्‍न केला होता. पण रंगनाथस्वामींनी शिवाजी महाराजांच्या मनात निर्माण झालेला किंतू काही चमत्कार दाखवून क्षणार्धात दूर केला, अशी आख्यायिका आहे. त्याचे जन्म स्थान हे सांगोला तालुक्यातील नाझरे गाव हे आहे.
रंगनाथस्वामींचे पूर्ण नाव रंगनाथ बोपजी कुलकर्णी. त्यांच्या आईचे नाव बयाबाई. बोपजी हे नाझरे गावचे कुलकर्णी होते. त्यांच्या तीन मुलांपैकी रंगनाथ हे मधले चिरंजीव होत. कल्याणी गावचे पूर्णानंद हे सहजानंदांचे शिष्य होते. रंगनाथांच्या वडिलांनी या पूर्णानंदांकडून संन्यासदीक्षा घेतली. तेव्हा त्यांचे नाव निजानंद ठेवण्यात आले. रंगनाथांना निजानंदांकडून अनुग्रह झाला. पुढे निजानंदांनी शके १५६४मध्ये मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी कर्‍हाड येथे जिवंतपणे जलसमाधी घेतली.
संन्यासी झालेले रंगनाथस्वामी शेवटपर्यंत ब्रह्मचारी राहिले. घोड्यावरून तीर्थयात्रा करताना सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील निगडी गावाजवळ एका ओढ्याकाठी त्यांच्या घोड्याचा खूर दगडात रुतला, म्हणून ते घोड्यावरून खाली उतरले आणि दैवी संकेत समजून निगडीत राहू लागले.
रंगनाथस्वामींची लेखनशैली आणि निरूपणशैली ही रामदासांसारखी सुस्पष्ट आणि रोखठोक आहे. त्यांनी हजारो पदे, पंचके आणि अष्टके लिहिली. समर्थ रामदासांचे वर्णन त्यांनी ‘राजाधिराज अवतरला हा या जगदोद्धारा’ या शब्दांत केले आहे. कल्याणस्वामी यांना फार अद्वैतचर्चा केलेली आवडत नसे. त्यांनी रंगनाथस्वामींना ‘अद्वैतचर्चा कंटाळवाणी सांडूनि वर्णा कोदंडपाणी’ (अद्वैतावर चर्चा करण्यापेक्षा श्रीरामाची उपासना करा) असा सल्ला दिला. त्यावर रंगनाथस्वामींनी ‘अद्वैतचर्चा जंव हे कळेना, तो पूर्ण रामीं मन हे वळेना’ असे जोरदार उत्तर दिले.

माघातील रामदासांच्या पुण्यतिथी उत्सवासाठी रंगनाथस्वामींनी वडगावी येण्याचे जयरामस्वामींना कबूल केले होते, पण ही गोष्ट ते विसरून गेले. त्यावेळी ते भागानगरला होते. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी त्यांना ते आठवले. त्वरित त्यांनी घोडा दौडवला. वाटेत झालेल्या रामोश्यांच्या हल्ल्याचा त्यांनी न घाबरता प्रतिकार केला आणि सायंकाळी ते वडगावला पोचले. त्यांच्या या धाडसाचे सार्‍यांनीच आश्चर्यमिश्रित कौतुक केले.
शके १६०६च्या मार्गशीर्ष वद्य दशमीला रविवारी रंगनाथस्वामींनी देहत्याग केला. त्यांची समाधी निगडी येथे आहे.
हरिविजयरामविजयपांडवप्रताप आदी सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय ग्रंथांचे कर्ते श्रीधर हे या रंगनाथस्वामींचे पुतणे होत.

Comments

  1. 🌼 सदगुरू श्री. #रंगनाथ_स्वामींच्या ३३६व्या #पुण्यतिथी निमित्त सद्गुरूंना कोटी कोटी #प्रणाम ! 🙏

    🌹🌼 आज दि.८ जानेवारी...

    सद्गुरू निजानंद #श्रीरंगनाथ_स्वामी यांच्या #पुण्यतिथी_उत्सवा
    निमित्त, #निगडी येथील त्यांच्या समधी स्थळास भेट देऊन,#सद्गुरुंचे_दर्शन घेतले...🙏🌼🌹

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भोग

मनुष्याच्या आयुष्यात सुखाचा भोग असो किंव्हा दुःखाचा भोग! तो मनुष्याला संचित पाप कर्म व पुण्यकर्म यामुळेच भोगावा लागतो. संतश्रेष्ठ जगतगुरू संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात प्रमाण देतात कि, भोंगे घडे त्याग!   त्यागें अंगा येती भोग !! ऐसे उफराटे वर्म!   धर्मा अंगी चं अधर्म !! देव अंतरे ते पाप! खोटे उगवा संकल्प !! तुका म्हणजे भीड खोटी ! लाभ विचारावा पोटी!! संतश्रेष्ठ संत शिरोमणी जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचा हा गाथ्यातील अभंग आहे. संत तुकोबाराय त्यांच्या या अभंगात असे सांगत आहेत कि, एखादा मनुष्य प्रपंच्यातील विषय भोग घेता असेल आणि त्याला काही काळानंतर त्याचा त्याग करावा वाटला आणि त्या विषयाचा त्याग केला कि, त्याला लगेच त्या सर्व संचित पाप आणि पुण्य कर्माचा भोग भोगावा लागतो, म्हणजे एखाद्य वाईट व्यक्तीने वाईट कर्म करीत असताना तो करीत राहिला परंतु त्याने तो वाईट कर्म न करण्याचा संकल्प केला आणि त्याने ते वाईट करणे सोडून देताच त्याच्यावर दुःखाचा डोंगर किंव्हा मोठा संकटाचा डोंगर कोसळतो याचाच अर्थ असा कि, त्याने वाईट कर्माचा त्याग करताच त्याच्या पूर्व कर्माचा भोग सम...